महात्माफुले नावाने प्रसिद्ध असलेले जोतीराव ऊर्फ जोतीबा गोविंदराव
फुले (जन्म : ११ एप्रिल १८२७; मृत्यू : २८ नोव्हेंबर १८९०), हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.
त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना
केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री
शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स.१८८८ या
साली मिळाली.
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध
ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची
मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती
त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी
लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक ठरले. आजही (२०२० साली) त्यांची ही ग्रंथसंपदा
समाजाला दिशादर्शक व प्रेरणादायी ठरते आहे. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये
महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी
असल्याचे सर्वमान्य आहे.
बालपण आणि शिक्षण
ज्योतीबा
फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा
फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या
वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात
महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ
आडनाव असले तरी, पुढे ते
फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे त्यांचे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा
आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीराव
केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा
त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई
यांच्याशी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. इ.स.
१८४२मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी
अतिशय तल्लख, त्यामुळे
पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला. ग्रामची या प्रसिद्ध
तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते.
त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास
मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील
शिस्तप्रिय, हुशार
विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
शैक्षणिक कार्य
महात्मा
फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
विद्येविना
मती गेली ।
मतीविना
नीती गेली ।
नीतीविना
गती गेली ।
गतीविना
वित्त गेले ।
वित्ताविना
शूद्र खचले।
इतके
अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन
समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य
आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय
केला. त्यांनी इ.स.१८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात
महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी
पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू
केल्या.
मानवी हक्कावर इ.स.१७९१ मध्ये थॉमस
पेन यांनी लिहिलेले
पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक
न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी
स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर त्यांनी भर
देण्याचे ठरवले. सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि
अनुमान होते. (Credit link: https://bit.ly/3edkbpA)